अमरावती, दि. २४ : _ग्रामीण परिसरातील गरीब कुटुंबांचे हक्काचे घर पूर्ण होण्यासाठी जिल्ह्यात महाआवास योजना राबवली जात आहे. मंजूर घरकुलधारक नागरिकांना उत्तम दर्जाचे बांधकाम साहित्य रास्त भावात उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अभियानाकडून बचत गटांच्या सहकार्याने ठिकठिकाणी ‘घरकुल मार्ट’ सुरु करण्यात आले असून, घरकुलधारकांना एकाच ठिकाणी बांधकाम साहित्य उपलब्ध होणार आहे._
आवास योजनेत अनेकदा शासकीय लाभ मिळूनही घर बांधकामासाठी उत्तम साहित्य वेळेत उपलब्ध न झाल्याने अनेक घराचे बांधकाम रखडते. त्यामुळे गरजूंचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास विलंब होतो. हे लक्षात घेऊन उमेद अभियानातील समूह, ग्रामसंघाद्वारे गावामध्येच घरकुल बांधकाम साहित्य उपलब्ध करून देत आहे. यामुळे बाजारभावापेक्षा कमी दरात घरकुल मार्टमधून साहित्य मिळाल्याने घरकुल बांधकामास गती मिळत आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्रीराम कुलकर्णी यांनी दिली.
घरकुल मार्टच्या माध्यमातून विटा, सिमेंट, गिट्टी, लोखंड, वाळू, टिनपत्रे, शौचालय शीट, दरवाजाची फ्रेम, खिडकी असे अत्यावश्यक बांधकाम साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. घरकुल मार्टद्वारे अल्प नफा घेऊन साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचीही सोय झाली असून, घराचे बांधकाम करण्याबाबत उत्साह दिसून येत आहे, अशी माहिती उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक सचिन देशमुख यांनी दिली.
नाममात्र नफा घेऊन चांगल्या दर्जाचे साहित्य उपलब्ध करून दिल्याने गरजूंना हक्काचे घर मिळण्यास व बचत गटांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी उमेद अभियानाच्या घरकुल मार्ट उपक्रमाचा लाभ होत आहे.
महिला बचत गटांना प्राधान्य : पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
_घरकुल बांधकामांना गती देणे, अपूर्ण घरकुल बांधकामे पूर्ण करणे, घरकुलासाठी अतिक्रमित जागा नियमानुकुल करणे आदी उद्देश ठेवून महाआवास योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात एकही व्यक्ती बेघर राहू नये, यासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत. आवास योजनेला गती देण्यासाठी विशेष शिबिरेही घेण्यात येणार आहेत. आवास योजनेला जोडून घरकुल मार्टमध्ये बचत गटांच्या साह्याने बांधकाम साहित्यही उपलब्ध होत आहे. त्यात महिला बचत गटांना प्राधान्य देत येत आहे. या उपक्रमामुळे आवास योजनेच्या अंमलबजावणीलाही गती येईल, असे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले._
*गटांनाही मिळेल आर्थिक बळ : जिल्हाधिकारी शैलेश नवाल*
_वंचित व गरजू नागरिकांचे हक्काचे घर पूर्ण होण्यासाठी महाआवास योजना राबवली जात आहे. घरकुल पूर्ण होण्यासाठी दर्जेदार बांधकाम साहित्य रास्त दरात मिळवून देत उमेद अभियानाने उत्तम पर्याय दिला आहे. गरजू व्यक्तीला चांगले बांधकाम साहित्य मिळण्यासह अभियानातील समूहांनाही त्यामुळे आर्थिक बळ मिळण्यास मदत होणार आहे, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले._
इतर मार्टही लवकरच सुरू : मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे
_घरकुल लाभार्थींना बांधकामविषयक साहित्य योग्य दरात एकाच ठिकाणी मिळावे यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने घरकुल मार्टची सुविधा उपलब्ध केली जात आहे. महाआवास योजनेत जिल्ह्यात 15 हजार घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात उमेद अभियानातर्फे 420 मार्टचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी 216 मार्ट आता सुरु करण्यात आले आहेत. उद्दिष्टानुसार इतर मार्टही लवकरच ठिकठिकाणी सुरु होतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले._