अमरावती, दि. 24 : कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्रीच्या पालनाबरोबरच चांगला आहार, कोविड सुसंगत जीवनशैली, नियमित वाफ घेणे आदींचा अवलंब केला पाहिजे. त्याबाबत जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून स्टीम सप्ताह 26 एप्रिल ते 2 मे दरम्यान राबविण्यात असून, सर्वांनी तो यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी केले.
साथीचे संक्रमण रोखण्यासाठी कोविड सुसंगत जीवनशैली, नियमित वाफ घेणे आदी बाबींचे पालन नागरिकांकडून पालन होणे आवश्यक आहे, या विविध आरोग्यतज्ज्ञांच्या सूचनांनुसार जिल्ह्यात स्टीम सप्ताह राबविण्याचा निर्णय पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला. त्यानुसार ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडूनही गावोगाव "चला वाफ घेऊ या, कोरोनाला हरवूया " या सप्ताहाची अंमलबजावणी होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.
पालकमंत्र्यांच्या आवाहनानुसार प्रत्येक तालुका आरोग्य अधिका-यांना मोहिमेबाबत सूचना देण्यात आली आहे व सोमवारपासून गावोगाव हे अभियान राबविण्यात येईल, असेही डॉ. रणमले यांनी सांगितले. ते म्हणाले की, कोरोना विषाणूला हरविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. विविध आरोग्यतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व कोरोनावरील अनुभव व अभ्यासानंतर असे निदर्शनास आले की, कोरोना विषाणूला पूर्णपणे हरविण्यासाठी या लढाईत सर्वांचेच प्रयत्न आवश्यक आहेत. प्रत्येक घरातून त्याचा कायमचा समूळ नायनाट करण्याचा प्रयत्न "स्टीम सप्ताह" राबवून आपल्याला करायचा आहे. मास्क लावणे, अंतर ठेवणे, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोषक आहार, व्यायाम, सुसंगत जीवनशैलीचा अवलंब यात वाफ घेणे ही कृतीही समाविष्ट आहे, असेही डॉ. रणमले यांनी सांगितले.
वाफ घेण्यासारखी बाब आपल्याला तशी परिचित आहे. सध्याच्या काळात तिचे महत्व मोठे आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून तिचे महत्व प्रत्येकाच्या मनावर बिंबवण्यासाठी उपयोग होणार आहे. यानिमित्ताने प्रत्येकाने मी कोरोनाला हरविणारच हा निर्धार केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
वाफ घेण्याबरोबरच व्हिटॅमिन सी गोळया, झिंक गोळया व मल्टीव्हिटॅमिन गोळ्या घेण्याबाबत आहार व योग करण्याबाबतही विविध आरोग्यतज्ज्ञांनी सुचविले दिवसातून तीन वेळा वाफ घ्यावयाची आहे व आपल्या नाकाव्दारे वाफेस श्वासाव्दारे शरीरात ओढणे व तोंडाने बाहेर सोडायची ही प्रक्रिया दहा वेळा करावयाची आहे. या प्रक्रियेकरीता दोन किंवा ३ मिनिटे लागतात. तसेच साध्या पाण्याने वाफ घेतली तरीही उत्तम आहे.
आरोग्य विभागातील विविध आरोग्यतज्ञांनी या वाफ घेण्याच्या पद्धतीला कोरोना विषाणुला हद्दपार करण्याकरीता अत्यंत उपयोगी प्रक्रिया पडू शकते असा विश्वास व्यक्त केलेला आहे. जर दररोज तिन वेळा वाफ घेतली तर कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळण्याकरीता मदत मिळू शकते. वाफेमुळे कोरोना विषाणुचा नाश होऊ शकतो असे मत व्यक्त केलेले आहे.
ही मोहीम यशस्वी करण्याकरीता आपण जनतेला ही प्रक्रिया अवलंबिण्यासाठी स्थानिक पदाधिकारी, विविध विभागातील कर्मचारी गाव पातळीवरील योग प्रशिक्षक ,गावकरी, युवापिढी तसेच लोकांमार्फत प्रसार व प्रसिद्धी करण्याबाबतचे आवाहन जि. प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, आरोग्य व वित्त सभापती जि.प. अमरावती बाळासाहेब हिंगणीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
ही मोहिम यशस्वी करण्याकरीता अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रेवती साबळे, माताबाल संगोपन अधिकारी डॉ विनोद करंजेकर, डॉ दिलीप च-हाटे तसेच संपूर्ण तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून कार्यवाही होत आहे.